*ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या शासन निर्णयात सुधारणा करा*
*आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना पत्र*
*ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक-मालकांची आर्थिक स्थिती ध्यानात घेण्याकडे वेधले लक्ष*
*चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक-मालकांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाची नियमावली गृह विभागाने 24 जुलै 2024 रोजी निश्चित केली. मात्र, या चालक-मालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शासन निर्णयात सुधारणा करावी, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि परिवहन मंत्री श्री. प्रतापजी सरनाईक यांना पत्राद्वारे केली आहे.*
यामध्ये नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्क 500 ऐवजी 200 रुपये आणि वार्षिक सभासद शुल्क 300 ऐवजी 100 रुपये करण्यात यावे. गृह विभागाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जारी केलेल्या शुद्धिपत्रकानुसार, कल्याणकारी मंडळात अशासकीय सदस्यांची संख्या 2 दर्शवण्यात आली आहे. मात्र, ही संख्या वाढवावी आणि 10 संघटनात्मक प्रतिनिधी समाविष्ट करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळात संघटनेच्या 3 प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षांनी केलेल्या मागणीप्रमाणे, रिक्षा चालकांना सन्मान निधी न देता 10 हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे आणि 60 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्ती वेतन लागू करावे अशी विनंती करण्यात आली आहे. यासोबतच, कल्याणकारी मंडळाच्या कामकाजासाठी शासनाने दरवर्षी 50 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशीही प्रमुख मागणी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन आ. श्री. मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना पत्र दिले आहे.
*आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक* राज्यातील हजारो ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी हे कल्याणकारी मंडळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.