भद्रावती, दि.०८ : शहरात सध्या गल्लीबोळात महिलांचा ग्रुप तयार करून बचत गटाच्या नावाने पैसे जमा केले जात आहे. हे बचत गट नोंदणीकृत नसून यांची कागदोपत्री माहिती नाहीत. अशा बचत गटातुन जमा झालेले पैसे गरजवंताला २ ते ३% मासिक व्याजदराने वाटले जातात. नंतर बचत गटाचा कालावधी संपला की जमा रक्कम आणि व्याजाची रक्कम बचत गटातील महिला सदस्यात समान वाटप केली जाते. काही हरहुन्नरी सदस्य पैसे तर उचलतात मात्र व्याज तर सोडा मुद्दल पण जमा करत नाही. कधी कधी ही रक्कम लाखाच्या घरात असते. असे लाखो रूपये उचलून काही लोक पसार झाल्याची माहिती आहे. तर कधी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून पैसे जमा करतात. सर्व पैशांचा हिशोब, जिम्मेदारी देतात त्याच व्यक्ती, महिला जमा झालेले पैसे देण्यास नकार देतात. महिला वर्ग मेहनतीचे किंवा बचतीचे पैसे थोडे थोडे बचत गटात जमा करून घर कामाकरिता, मुलांच्या शिक्षणाकरिता तर कधी औषधांसाठी वापरतात. परंतु काही लालची लोकांमुळे महिला वर्ग आर्थिक संकटात सापडत आहे. घरी परिवारात कलह निर्माण होत आहे. त्यामुळे महिलांनी आर्थिक व्यवहार करतांना विचार करूनच करावे असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती ने केले आहे. सोबत शासनाने याकडे लक्ष देत कायद्यात तरतूद केली पाहीजे.
*चौकट :* महिला वर्गाने खास करून बचत गटाच्या नावाखाली पैसे जमा करत असतांना ते नोंदणीकृत बचत गटात जमा करावे. संबंधित बचत गटाची पडताळणी करून, सर्व खाते, कागपत्रे तपासून नंतरच पैसे जमा करावे. कारण नोंदणीकृत बचतगटातून असे प्रकार घडल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो. जास्त लालसा पोटी मेहनतीने कमावलेले पैसे बुडणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रवीण रामचंद्र चिमुरकर सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर.