अरविंदो कोळसा खदान कंपनीने तीन गावांचे पुनर्वसन न करता अवैध रीतीने खाणीचे काम सुरू केले
या खाण कामामुळे घराना तडे, रस्ते खणून ठेवले आहे
खाण कंपनीला पुनर्वसन करण्याबाबत अटी शर्तीनुसार कारवाई करण्याचे आदेश देऊ – खनिकर्म मंत्री शंभूराजे देसाई
मुंबई , दि. ११ – चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत उत्खननासाठी स्फोटकांचा मोठा वापर होतो. अरविंदो कंपनीने तीन गावांचे पुनर्वसन न करता काम सुरू केले.यामुळे लोकांच्या घराला तडे गेले आहे, या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. याप्रकरणी अटी शर्तीनुसार सबंधित कंपनीला पुनर्वसन बाबत निर्देश देऊ असे आश्वासन खनिकर्म मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात चंद्रपुरातील खाणीमुळे सामान्य जनतेला होणाऱ्या अडचणींचा पाढा काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत वाचला. अरविंदो कंपनी मार्फत रात्री देखील ब्लास्टिंग करण्यात येते, लोकं झोपू शकत नाही. या खाणीच्या कामामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या कंपनीने गावातील जिल्हा परिषदेचा रस्ता खोदून ठेवला, घरांना तडे गेले आहेत. या कंपनीचे काम बंद करायला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले पण वरून आदेश आल्यामुळे पुन्हा खाणीचे काम सुरू झाले. गावचे पुनर्वसन न करता हे काम कसे सुरू झाले? गावकऱ्यांना काही मोबदला दिलेला नाही ,त्यांना न्याय मिळणार का असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.
या प्रश्नावर उत्तर देताना खनिकर्म मंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकरणी अटी शर्ती असून गावांचे पुनर्वसन झाले नसेल तर याबाबत विहित कालावधीत पुनर्वसन करण्याचे लेखी आदेश देऊ असे आश्वासन दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमुळे पाण्याच्या स्रोत कमी झाल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी मांडल्यामुळे या प्रश्नावर सर्व लोकप्रतिनिधींची लवकर बैठक घेण्यात येईल असे खनिकर्म मंत्री देसाई यांनी स्पष्ट करा
अरविंदो,अम्टा खदानीमुळे समास्यांची वाढ : आमदार किशोर जोरगेवार
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा #खाणींच्या अतिउत्खननामुळे परिसरातील शेती आणि जलस्रोतांवर नकारात्मक परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. कोळसा कंपनीने जमिनी अधिकृत केल्या मात्र जमीन मालकाला प्रतिस्पूर्ती केली नाही. कोळशाखाणीमुळे शेतकऱ्यांचे पांदन रस्ते सुद्धा अडवले जात आहे. विशेषतः भद्रावती येथील अरविंदो कंपनी कर्नाटक एमटा ही कोळसा खाण आणि प्रस्तावित अनेक कोळसा खाणींमुळे या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने चौकशी करून उत्खननामुळे होणारे शेतीचे नुकसान, जलस्रोतांचे नुकसान आणि प्रदूषण या बाबींवर लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी तसेच या कोळशाखाणींमध्ये सुरू असलेल्या अँटी सोशल ऍक्टिव्हिटी बद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित करून कारवाई करण्याची मागणी चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार यानी विधान सभागृहात केली.