चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची गरज
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा
ना.पंकजाताई मुंडे यांनी दिले त्वरित कारवाईचे आदेश
पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन*
*चंद्रपूर, दि.२१ : चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या प्रदूषणाची परिस्थिती गंभीर होत असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे मत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.*
चंद्रपर जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये कंपन्यांच्या नियमबाह्य कारभारामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येबाबत आज, गुरुवार दि. २० मार्चला पर्यावरण आणि हवामान बदल व पशु संवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेत विधानभवनातील दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमूख उपस्थिती होती यावेळी आमदार देवराव भोंगळे, प्रधान सचिव विनिता सिंघल, अविनाश ढाकणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
आमदार सुधिर मुनगंटीवार म्हणाले, ‘देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचा समावेश होतो. जिल्ह्यातील डब्ल्यूसीएल, सी.टी.पी.एस. आणि सिमेंट कंपन्यांकडून प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या नमुन्यांचे निकाल मापदंडाच्या बाहेर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उद्योगांनी प्रदूषणाचे दररोज मॉनिटरिंग करावे आणि त्याचे नियमित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावेत.’ यासोबतच, जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रणासाठी स्थायी समिती पुनर्गठित करण्याची गरज असून, संबंधित आमदारांना त्यामध्ये समाविष्ट करावे, तसेच समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी किंवा पालकसचिवांना नेमावे तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित सदस्य म्हणून समितीवर घ्यावे असेही ते म्हणाले.
पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देत, चंद्रपूरसारख्या परिसरात पर्यावरण प्रदूषण समित्या अधिक सक्षम असाव्यात, असे मत मांडले. या समित्यांनी महिन्यातून एकदा प्रदूषण मॉनिटरिंग करणे गरजेचे आहे. अधिक मॉनिटरिंग केल्यास प्रदूषणाची खरी परिस्थिती स्पष्ट होईल. यासाठी लोकचळवळ निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकी दरम्यान विविध विषयांवर सखोल चर्चा करत आवश्यक बदल करण्याचे आ. मुनगंटीवार यांनी सुचवले. यावर मंत्री महोदयांनी यासंदर्भात माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले व जोपर्यत चंद्रपूर जिल्ह्याची प्रदूषणाच्या या समस्येतून मुक्तता होत नाही तोपर्यंत पर्यावरण विभाग पूर्ण लक्ष देऊन काम करेल असा विश्वास दिला. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय तसे लवकरच कठोर उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.