चंद्रपूरची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या इरई नदीसाठी लोकचळवळ उभी होईल
पालकमंत्री डाॅ. अशोक ऊईके यांनी व्यक्त केला विश्वास
इरई नदी खोलीकरण अभियान भावी पिढीसाठी ठरणार संजीवनी – आमदार सुधीर मुनगंटीवार
इरई नदी खोलीकरण अभियानाचा जल्लोषात शुभारंभ
चंद्रपूर – इरई नदी ही “चंद्रपूरची जीवनवाहिनी” आहे. लोकसहभागातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने नदीचे खोलीकरण अभियान यशस्वी होईल. या अभियानाच्या निमित्ताने लोकचळवळ उभी राहील असा विश्वास आहे. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्हा नदीसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असून, पर्यावरणपूरक आणि लोकाभिमुख उपक्रमांची दिशा या उपक्रमातून स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरण अभियानाचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक ऊईके यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. त्यावेळी डॉ. उईके बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
नदी खोलीकरणाचा संकल्प करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांनी सहभागी व्हावे. माध्यमांनी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन डॉ. उईके यांनी केले. राळेगाव विधानसभेतील “चक्रवती नदी” लोकसहभाग आणि प्रशासनाच्या सहकार्याने नदीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले व ते यशस्वी झाले. इरई नदीच्या सौंदर्यकरणाचे काम देखील 100 टक्के पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना मिळणारे वेतन आणि भत्ते मिळून एकूण 5 लाख रुपयांचा धनादेश या अभियानासाठी सुपूर्द करीत असल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके म्हणाले.
प्रशासन व लोकसहभागातून इरईला नवे रूप देण्याचा निर्धार – आ.. मुनगंटीवार
निसर्ग रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि आजपासून सुरू झालेले इरई नदी खोलीकरण अभियान हे भावी पिढ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. या अभियानासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार देत दिलेला सहभाग कौतुकास्पद असून, या पवित्र कार्यात स्वतःचा एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार . सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
आ. मुनगंटीवार म्हणाले, पालकमंत्री डाॅ. अशोक ऊईके यांच्या नेतृत्वात इरई नदी खोलीकरणाची सुरुवात होत असून हा संपूर्ण जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण आहे. या अभियानात सहभागी होत कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला असून, त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मी स्वतः देखील एक महिन्याचा पगार जाहीर केला. ही भावना सर्व जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली तर राज्यातील नद्यांचे चित्र पालटू शकते, असेही ते म्हणाले.
जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात “चला जाणूया नदीला” हे अभियान सुरू करण्यात आले होते. इरई नदीतील साचलेल्या ओवरबर्डनमुळे या नदीसाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तसेच 81 किलोमीटर लांबीच्या इरई नदीपैकी 17 किलोमीटरच्या खोलीकरणासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
*‘पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग व्हावा’* चंद्रपूरमध्ये सरासरी 1100 मिमी पावसाचे प्रमाण असून, या पाण्याचा योग्य वापर, संवर्धन आणि जमिनीत जिरविणे आवश्यक आहे; त्यामुळे पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग होण्यासाठी प्रभावी आणि दूरदृष्टीने नियोजन करणे गरजेचे असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच चंद्रपूरमध्ये साबरमतीसारखा आधुनिक रिव्हर फ्रंट विकसित करण्याचा संकल्प केला असून येणा-या कालावधीत सरकार रिवर फ्रंटलाही मान्यता देईल, असा विश्वास आमदार श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.