*संविधान आणि लोकशाहीची हत्या करणारी काँग्रेसी वृत्ती नष्ट करण्याचा संकल्प करावा*

2

*संविधान आणि लोकशाहीची हत्या करणारी काँग्रेसी वृत्ती नष्ट करण्याचा संकल्प करावा*

*आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे ‘संविधान हत्या दिवस’ला जनतेला आवाहन*

*आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘संविधान हत्या दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन*

*बल्लारपूर – सूर्य आणि चंद्रानंतरही आपली लोकशाही कायम राहिली पाहिजे, हा भाव आपण मनात ठेवला पाहिजे. देशाने आपल्याला काय दिले याऐवजी आपण देशाला काय दिले, याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी ५० वर्षांपूर्वी या देशाने भोगलेली आणीबाणी आणि आणीबाणी लादणारे या दोन्ही गोष्टी आपल्याला कधीही विसरता येणार नाही. पुढच्या ५० वर्षांपर्यंत या लोकांना धडा शिकविण्याचा संकल्प करावा लागेल. संविधानाची आणि लोकशाहीची हत्या करणारी काँग्रेसी वृत्ती समूळ नष्ट करण्याचा संकल्प करावा लागेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*
आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बल्लारपूर येथील किल्ला वॉर्डमध्ये ‘संविधान हत्या दिवस-२०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदन सिंग चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, अध्यक्ष रणंजय सिंग, काशिनाथ सिंग, मंगेश गुलवाडे, निलेष खरबडे, रेणुका दुधे, समीर केणे, मनीष पांडे, वैशाली जोशी, शिवचंद द्विवेदी, किरण बुटले, नम्रता ठेमस्कर, जयश्री मोहुर्ले, सारिका कणकम, वर्षा सुंचुवार, आरती आक्केवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रसिंग लेंजे, विनायक बोरकर, भजनदास अलमस्त, नामदेव चन्ने, मोरेश्वर ठेकरे, मनोहर सहारे, शोभा भोयर, उद्धव निकुरे या आणीबाणी सेनानींचा सत्कार करण्यात आला. ‘भोपाळ गॅस कांडमध्ये हजारो लोकांचे जीव जाणे, दंगलींमध्ये शीख बांधवांना प्राण गमवावे लागणे आणि सत्तेसाठी काँग्रेसने आणीबाणी लादणे या तीन गोष्टी हा देश कधीही विसरणार नाही,’ असा उल्लेख आ. श्री. मुनगंटीवार यांनी सुरुवातीलाच केला.
आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आणीबाणी हे एक दूष्टपर्व होते. पण माझा देश, माझ्या भागातील जनता गिधडांच्या धमक्यांना घाबरत नाही, याचा आनंद आहे. ‘देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए… मै रहू या ना रहू, भारत ये रहना चाहिए’, हा भाव प्रेरणादायी ठरला. स्व. इंदिरा गांधींनी संविधानाची हत्या करत आणीबाणी जाहीर केली. संविधानात राष्ट्र धोक्यात असेल किंवा युद्धामुळे अंतर्गत व्यवस्था बिघडली असेल तर त्यावेळी आणीबाणी लागू करता येते. मात्र, आणीबाणीच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा कुण्या नेत्याने चुकीचा वापर केला असेल, त्या नेत्याचे नाव स्व. इंदिरा गांधी आहे.’

देशात महागाई वाढलेली होती. भ्रष्टाचार वाढलेला होता. सर्वसामान्य जनतेच्या मनात रोष होता. अनेक राज्यांना बरखास्त करण्यात आले. १९७२ नंतर भारतात उपासमारी वाढली होती. अशा हुकुमशाही वातावरणात १२ जून १९७५ ला न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक चुकीच्या पद्धतीने झाल्याचा ठपका ठेवला. पैसा वाटल्याचे, सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर झाल्याचे तथ्य पुढे आले होते. न्यायालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले. इंदिरा गांधी सर्वोच्च न्यायालयात गेल्या. सदस्यत्व रद्द होण्यापासून वाचले. मात्र संसदेत भाषणाला निर्बंध आले. त्याचवेळी स्व. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात इंदिरा सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर येऊ लागले होते. इंदिरा गांधींना भीती वाटू लागली. त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या. एखादी बातमी विरोधात आली तर पत्रकाराला अटक होऊ लागली. हुकुमशाही, तानाशाहीची मर्यादा ओलांडण्यात आली, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला.

*‘स्व. इंदिरा गांधींनी संपूर्ण देशाला बंदिशाळा केली’*
श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी, जॉर्ट फर्नांडीसजी यांची काय चूक होती? वंदे मातरम् म्हणणे, नमस्ते सदा वत्सले म्हणत ही मंडळी रस्त्यावर उतरली. यात काय चूक होती? त्यांना तुरुंगात टाकले आणि देशातील अधिकारांना संकुचित करण्यात आले. केवळ एका व्यक्तीच्या पदासाठी, स्वार्थासाठी हे सारे सुरू होते. न्यायाधिशांनी इंदिराजींच्या विरोधात निर्णय दिला म्हणून संपूर्ण देशाला बंदिशाळा करण्यात आली. तिरंग्यासाठी हजारोंनी प्राणांची आहुती दिली होती. पण इंदिरा गांधींनी शहिदांचा अपमान केला. पण जो देश आपल्या इतिहासातील चुका विसरतो, तो देश कधीच प्रगती करत नाही. त्यामुळे चुका लक्षात ठेवायच्याच आहेत, आणि चुका करणाऱ्यांनाही विसरायचे नाही, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
*‘कौन चले भाई कौन चले… भारत माँ के लाल चले’*
माझे वडील आणीबाणीत तुरुंगात होते. मी १२ वर्षांचा होतो. आमची आर्थिक परिस्थिती बरी होती. पण आणीबाणीत तुरुंगवास भोगणारे असे अनेक होते, ज्यांच्या घरात चांगली स्थिती नव्हती. त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे संस्कार माझ्या आईने दिले. आम्ही वडिलांना भेटायला नागपूरला जायचो, तेव्हा बोलण्यासाठी फक्त दहा मिनिटे दिली जायची. किती दिवस तुरुंगात राहणार, हे माहिती नव्हते. हजारो कुटुंब या परिस्थितीचा सामना करत होते. पण त्यानंतर मिसाबंदीतून लोक बाहेर पडले, तेव्हा जटपुरा येथील कार्यक्रमातील ‘कौन चले भाई कौन चले… भारत माँ के लाल चले’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ हे नारे आजही मला आठवतात, या शब्दांत आ. श्री. मुनगंटीवार यांनी आठवणींना उजाळा दिला.
*‘वाकडी नजर मोडून काढा’*
काही पक्षांचे नेते असे आहेत की ज्यांनी आपलं कुटुंब सावरण्यासाठी देश सोडला, मात्र देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी देश वाचविण्यासाठी परिवार सोडला. राष्ट्रभावना जीवंत ठेवण्याचे काम मोदीजींनी केले आहे. मा.मोदीजी कधीही देशाचे नुकसान होऊ देणार नाही. आता आपली जबाबदारी आहे, की चुकीच्या नजरांपासून देशाला वाचवायचे आहे. आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही नेत्याने देशाकडे वाकड्या नजरेने बघू नये, याची काळजी घ्यायची आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here