*शेतकऱ्यांना 14 ऑगस्ट 2025 पर्यंत करता येणार अर्ज*
*आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची तात्काळ दखल*
*शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी*
*चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे देखील ठोस मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आ. श्री. मुनगंटीवार यांच्या तत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.*
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 साठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत पूर्वी 31 जुलै 2025 होती. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि काही भागांतील नेटवर्कच्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करता आली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात केवळ 48,500 शेतकऱ्यांनीच नोंदणी केली असून, मागील वर्षी याच योजनेअंतर्गत सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
ही तफावत लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये म्हणून आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदणीची मुदत वाढविण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे केली होती. या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 साठी नोंदणीची अंतिम मुदत 14 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या सेवा केंद्रावर किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन देखील आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.