घुग्घुस : – कोरपना तालुक्यातील वनोजा–पैनगंगा रेती घाटावर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननामुळे परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल विभाग आणि कोरपना पोलीस निरीक्षक यांच्या ढिलाईमुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
थेट नदी पात्रात आणि गावाच्या बाहेरून शेतशिवारातून जेसीबीच्या सहाय्याने नवीन अवैध मार्ग तयार करून रेती वाहतूक सुरू आहे. एका नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात रेती साठा करून ती चार ते पाच हजार रुपयांत खुलेआम विक्री केली जात आहे. दररोज ७ ते ८ ट्रॅक्टरचा तांडव सुरू असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
तहसीलदार यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे मनोबल वाढले असून, नदी पात्रात वाहतूक अडथळा येऊ नये म्हणून नवीन ताटवे टाकून जोरात रेती उपसा सुरू आहे. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी नियमांना केराची टोपली दाखवत अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे वाळू माफियांचा उच्छाद वाढत चालला आहे.
या अवैध उत्खननामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलावर पाणी फेरले जात असून पर्यावरणाचा ऱ्हास आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरीही जबाबदार अधिकारी मौन बाळगून बसले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व शेतकरी बांधवांनी जोरदार मागणी केली आहे की, रेती घाटावर मोठमोठे खड्डे पाडून वाळू वाहतुकीचे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात यावेत तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
प्रशासन आता तरी जागे होणार का, की वाळू माफियांच्या दहशतीपुढे शासनही हतबल ठरणार?