स्वामिनाथन आयोगाचे सदस्य व किसान सभेचे नेते कॉ. अतुलकुमार अंजान यांना वणी येथे श्रद्धांजली

वणी : कॉ. अतुल कुमार अंजान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने वसंत जिनिंग येथे दि. १५ मे रोजी श्रद्धांजली सभा घेण्यात आली.
या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष कॉ .ऋषी उलेमाले होते. या सभेला अ.भा. संविधनिक सभेचे अध्यक्ष गीत घोष, भाकप चे कॉ. अनिल हेपट, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा ढुमने, पंढरी मोहीतकर ह्यांनी उपस्थिती दर्शवून आपले विचार व्यक्त केले.
कॉम्रेड अतुल कुमार अंजान ह्यांची ओळख म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते शेतकर्यांचा समस्यावर उपाय शोधण्यासाठी तयार केलेल्या स्वामिनाथन आयोगाचे महत्वपूर्ण सदस्य होते. ते विद्यार्थी दशेपासून सातत्याने चळवळीत अग्रेसर होते. त्यांचा निधनापर्यंत ते कष्टकरी वर्ग शेतकरी, कामगार यांच्या हक्क व न्यायासाठी आंदोलनात सक्रिय होते. कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही अंथरुणावर पडून हॉस्पिटल मध्ये भर्ती होत पर्यंत कष्टकऱ्यांचा चळवळीत मग्न होते. असे महान क्रांतिकारक कॉ. अतुल कुमार अंजान यांचे निधन वयाचा ७० व्या वर्षी दि. ३ मे रोजी कर्करोगाशी झुंज देताना झाले.
” कष्टकरी वर्गाचे शोषणातून मुक्ती साठी कार्ल मार्क्स यांचे विचार अनन्य साधारण असून हे विचार ज्यांनी आत्मसात केले तो संपूर्ण हयात कष्टकऱ्यांचा न्याय व हक्कासाठी लढत असतो व कॉ. अतुलकुमार हे असेच क्रांतिकारी होते”, असे मत कॉ.अनिल हेपट यांनी व्यक्त केले तर गीत घोष यांनी, ” कॉ.अतुल कुमार हे कष्टकऱ्यांचे जन नायक होते व ते आपल्या कृतीतून चळवळीला नेहमी पर्याय देत असत, त्यांची भूमिका नवीन पर्यायातून कष्टकऱ्यांचा आंदोलनाला नवीन मार्ग उपलब्ध करून देत असल्याने त्यांचा जाण्याने कष्टकरी वर्गाचा चळवळीचे नुकसान झाले असले तरीही कॉम्रेड कधी मरत नसतो तर तो कृती व विचाराने नेहमीच जिवंत असतो” असे मत व्यक्त केले. ” कॉ. अतुल कुमार हे मार्क्सवादी विचाराचे सच्चे सिपाही असल्याने त्यांनी शेतकरी, कामगार यांच्या साठी केलेल्या प्रखर संघर्षाचे ते प्रतीक ठरले आहेत, त्यामुळे कष्टकरी वर्गाला जोपर्यंत हक्क व न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करीत राहणे हेच अतुल कुमार अंजान यांना श्रद्धांजली ठरेल असे मत कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी व्यक्त केले.
या श्रद्धांजली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. अनिल घाटे यांनी केले तर संचालन कॉ. सुनील गेडाम यांनी केले व आभार प्रवीण रोगे यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.