बल्लारपूरचे नाव देशात मोठे करा, आई-वडिलांना विसरू नका!
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
*बल्लारपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थिती
*बल्लारपूर – विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यात त्यांचा स्वतःचा फायदा आहेच, पण बल्लारपूरचाही मोठा फायदा आहे. आपल्या भागातील एखादा विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थीनीचे राज्यभर, देशभर कौतुक होते, तेव्हा बल्लारपूरचे आणि येथील लोकांचेही कौतुक होत असते. माझ्या बल्लारपुरातील विद्यार्थ्यांनी देशात नावलौकीक प्राप्त करावा. त्याचवेळी ज्या आई-वडिलांनी संघर्षातून आपल्याला मोठं केलं, त्यांचाही विसर पडू देऊ नका, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.*
बल्लारपूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते चंदनसिगं चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपच्या महामंत्री संध्याताई गुरनुले, भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रणंजय सिंग, निलेश खरबडे, वैशाली जोशी, नम्रता आचार्य, रेणुका दुधे, देवा वाटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले, ‘स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी नाही तर माझ्या गावासाठी, जिल्हा आणि देशासाठी मी मेहनत करेन, हा भाव ठेवून भविष्य घडविणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षणाच्या संधी वाढाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, बल्लारपूर येथे S.N.D.T. विद्यापीठाचे केंद्र मंजूर केले. सोमनाथ (मुल) येथे भव्य कृषी महाविद्यालय उभारले जात आहे.आता मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजसाठी मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच बल्लारपूर येथे सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन लवकरच होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय आणि डॉ. बाबा आमटे अभ्यासिका उपयुक्त ठरत आहेत. यामागे आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी आणि जिल्ह्याचे नाव देशभरात गौरवाने घेतले जावे, याच उद्देशाने हे सर्व प्रयत्न सुरू आहेत.’
एसएनडिटीमध्ये ६२ अभ्यासक्रम सुरू होतील, तेव्हा या जिल्ह्यातील माझ्या बहिणींच्या कौशल्यांसाठी आकाश मोकळे होणार आहे. स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरच्या माध्यमातून आणखी एक दालन मोकळे करून दिले आहे. शिक्षणावर फक्त श्रीमंताचा अधिकार असू नये. उलट ज्यांच्या मनामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्ज्वलित करण्याची गरज आहे, त्या परिवारांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हा उद्देश आहे असेही ते म्हणाले.

“शिक्षण हे स्वैराचारी असता कामा नये, ते संस्कारी असले पाहिजे”. खूप शिकल्यावरही आई-वडिलांचा परिचय करून देताना लाज वाटत असेल तर काहीच उपयोग नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘माणूस द्या मज माणूस द्या’. शिक्षणाचा अर्थ माणुसकी जोपासणारा नसेल, तर त्या शिक्षणाचा फक्त धनप्राप्तीसाठी उपयोग होईल. आत्मविश्वास जागवावा लागेल. त्यातूनच पुढचा मार्ग सुकर होणार आहे. पैसा महत्त्वाचा आहे, पण सर्वस्व नाही. मन निराश न ठेवता जगातील उत्तमोत्तम ज्ञान कसे आत्मसात करता येईल, याचा सातत्याने विचार करा. कोणत्याही युगात शिक्षणाचे महत्त्व कायमच राहिले आहेत. म्हणूनच घरावरील नेमप्लेटवर नावाखाली शिक्षणचाच उल्लेख असतो. आपल्या संपत्तीचा नसतो. शिक्षण हे धनापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. शिक्षण हा सर्वाधिक मिरवण्याचा अलंकार आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.