कार्तिक पौर्णिमा यात्रेनिमित्त वढा येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक कार्य
वढा (ता. घुग्घुस) : विदर्भाची पंढरी म्हणून लौकिक लाभलेल्या वढा येथे कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी तसेच पवित्र पैनगंगा व वर्धा नदीत स्नान करण्यासाठी हजारो भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेतात. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक यात्रेत धार्मिक श्रद्धा, भक्तीभाव आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम पाहायला मिळतो.
यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेच्या सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे त्यांच्या सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांचा शुभारंभ लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे प्रतिनिधी श्री Y.G.S. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ उपाध्यक्ष श्री प्रशांत पुरी, सहायक महाप्रबंधक विद्या पाल, सहायक महाप्रबंधक श्री तरुण केशवाणी उपस्थित होते. तसेच वढा सरपंच श्री किशोर वरारकर, ग्रामपंचायत सचिव सौ. मुळे, श्री दीपक साळवे, श्री सूरज तोतडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यक्रमात सहभागी झाले.
या उपक्रमांत यात्रा स्थळाची स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता अभियान, यात्रेकरूंना मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, यात्रेच्या मार्गावर वढा ते पांढरकवडा मोफत बस सेवा, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण, तसेच भाविकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी “I ❤️ वढा” या आकर्षक सेल्फी पॉईंटचेही लोकार्पण करण्यात आले.
यामुळे यात्रेदरम्यान भाविकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता यावे, हा मुख्य उद्देश असल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांना सातत्याने चालना मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने आजवर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार कंपनीच्या प्रतिनिधींनी या प्रसंगी व्यक्त केला.
भाविक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्तिक पौर्णिमा यात्रेचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाची ही परंपरा पुढील अनेक वर्षे अविरतपणे सुरू राहील, अशी सामूहिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.