प्रचंड मंथन करून तयार केलेले संविधानिक कायदे आज निवडून दिलेली सरकारेच बदलवित आहेत – प्रभू राजगडकर
कॉ शंकरराव दानव यांच्या स्मृतिदिनानिमित्त वणी येथे वैचारिक प्रबोधन संपन्न
________________________
वणी : “जगाचा इतिहास दाखवतो की जनतेने आपल्यावरील शोषणचे विरोधात आंदोलन केल्याने सत्ताधाऱ्यांनी कायदे करून जनतेला अधिकार दिलेला आहे. आपल्या देशात सुद्धा संविधानाचे माध्यमातून जनतेला प्रचंड अधिकार मिळाले आहेत. आदिवासींना व दलितांना त्यांचे शोषण होऊ नये, त्यांना समानतेची संधी प्राप्त व्हावी या अनुषंगाने कायदे करण्यात आले आहेत. आज स्वातंत्र्यचा ७५ वर्षानंतर मात्र आपणच निवडून दिलेली सरकारेच समताधिष्ठित कायदे बदलवून भांडवलदारांच्या हिताची कायदे करीत आहेत. यावर एकही खासदार किंवा आमदार बोलत नाही, परंतु कम्युनिस्ट मात्र यावर सातत्याने आंदोलनात आहेत.” , असे प्रतिपादन प्रागतिक विचारवंत व लेखक प्रभू राजगडकर यांनी कॉ. शंकरराव दानव यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी कॉ शंकरराव दानव यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त वणी येथील वसंत जीनिंग चे सभागृहात “कॉ शंकरराव दानव : व्यक्तित्व आणि संघर्ष ” हा एक दिवसीय वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रमाचे उद्घाटक वसंत जिनिंगचे अध्यक्ष प्रमोद वासेकर तर अध्यक्ष म्हणून कॉ ॲड दिलीप परचाके आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रागतिक विचारवंत व लेखक प्रभू राजगडकर, माकपचे राज्य कमिटी सदस्य कॉ अरुण लाटकर, अ भा संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष कॉ गीत घोष उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर माकपचे जिल्हा सचिव कॉ ॲड कुमार मोहरमपुरी, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, चंद्रशेखर सिडाम, कलावती शंकरराव दानव ,मनीष इसाळकर, अनिता खुनकर, प्रीती करमणकर, रामभाऊ जिद्देवार, सदाशिव आत्राम, श्रीकांत तांबेकर, खुशालराव सोयाम, कवडू चांदेकर, सरिता दानव आदी उपस्थित होते.
राजगडकर यांनी पुढे बोलताना खंत व्यक्त करताना सांगीतले की, ” आदिवासींचा जमिनी हस्तांतरित किंवा भाड्याने देता येत नाही असा कायदा आहे, परंतु आता त्या जमिनी मोठे भांडवलदार भाड्याने घेऊन उत्खनन करून प्रचंड नफे कमवीत आहेत. दुसरी कडे पोषण आहार कर्मचारी ६६ रुपयाची २०० रुपये रोजी वाढवून द्या म्हणून मागणी केली असता त्यांना सरकार फक्त १३ रुपये वाढवून देते आणि लाडकी बहीण म्हणून न मागता महिन्याला १५०० रुपये फुकटात दिले जाते”.
यावेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ अरुण लाटकर यांनी स्वंतत्र चळवळीत असलेले चार प्रवाह आणि स्वातंत्र्यानंतर त्या चार प्रवाहांच्या राजकीय सत्तेतील वाट्यातून झालेले बदल यांच्या ऊहापोह करीत जनतेचा हिताची धोरणे राबविता राबविता रोजगार विहीन विकासानंतर रोजगार गमविणाऱ्या विकासापर्यंत कसे पोहोचलो याचे सविस्तर मार्गदर्शन केले. कॉ लाटकर यांनी सांगितले की, “लोकशाही मध्ये भांडवलदारांच्या गरजा पूर्ण होत नसतील तर त्याचे रूपांतर फॅसिस्ट सत्तेत होत असते आणि जगातील फॅसिस्ट सत्ताधारी हिटलर व मुसोलिनी यांना ठेवण्याचे कार्य कम्युनिस्टांनी केले आहे” असे सांगितले.
या कार्यक्रमात संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष कॉ गीत घोष यांनी कॉ शंकरराव दानव: व्यक्तित्व आणि संघर्ष या विषयावर बोलताना म्हटले की, “कॉमरेड हा कधीही मरत नसतो, कारण तो वर्ग आधारित शोषणाचा व्यवस्थेला नष्ट करून वर्गविहीण, शोषणविहीन समाजव्यवस्था आणण्यासाठी कृती करीत असल्याने त्याने केलेली कृती दुसऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याने तो त्याचा आदर्शांमध्ये, प्रेरणेमध्ये जिवंत असतो.”
ॲड. डी बी नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कॉ दानव यांच्याशी रक्ताचे संबंध नसतानाही यांचे द्वितीय स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम साजरा होऊन त्यांच्या व्यक्तित्व आणि संघर्षावर चर्चा होणे हे एक त्यांच्या महानतेचे लक्षण आहे.
कार्यक्रमाचे संचालन कॉ ॲड कुमार मोहरमपुरी यांनी केले तर आभार देविदास मोहकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक गावातून कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गजानन ताकसांडे, बादल कोडापे, सुधाकर सोनटक्के, अंकलू गोंलावर, संजय वालकोंडे, देविदास आत्राम, हरिभाऊ चिकरम, भाऊराव टेकाम, शंकर गौतरे, वंदना गेडाम, अर्जुन शेडमाके, शामराव जाधव, सुलाब पवार, धनंजय भोयर, मंगेश सरोदे, बंडू मटकुलवार, अरुण चिंचोलकर, अशोक गेडाम, नेताजी गेडाम, वामन बोबडे आदींनी परिश्रम घेतले.