*महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने भारत-अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराविरोधात वणी येथे भरउन्हात प्रचंड मोर्चा निघाला
*वणी* — भारत – अमेरिका प्रस्तावित व्यापार करारा विरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.त्याअंतर्गत नुकतेच वणी येथे किसान सभेने भरउन्हात प्रचंड मोर्चा काढुन राष्ट्रपती महोदयाचे नावे मागण्यांचे निवेदन तहसिलदार,वणी यांना देण्यात आले.निवेदनात खालील मागण्यांचा समावेश करण्यात आला.दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेला हा करार देशातील शेती, सहकार क्षेत्र आणि संविधानिक मूल्यांवर परिणाम करणारा असल्याचे सांगण्यात आले. या करारामुळे राज्यांच्या अधिकारांवर गदा येण्याची शक्यता असून, शेतीसारख्या राज्य विषयात केंद्राचा हस्तक्षेप वाढेल, तसेच परदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत अधिक वर्चस्व मिळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
या करारामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली किमान आधारभूत किंमत (MSP) व FRP यंत्रणा कमकुवत होण्याची शक्यता आहे. तसेच कर्जमाफी, शेती अनुदान आणि आर्थिक सुरक्षेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जागतिक व्यापार संघटना (WTO) च्या अटींमुळे भारतीय शेतीवर निर्बंध येऊन लघु व सीमांत शेतकरी अधिक अडचणीत येतील, तर सहकार क्षेत्र, बियाणे व्यवस्था आणि ग्रामीण रोजगारावरही नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका व्यापार करार तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेती, दुग्धव्यवसाय, बियाणे व सहकार क्षेत्रावर कोणतेही प्रतिकूल निर्णय घेऊ नयेत, तसेच कराराच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती स्थापन करावी, अशी मागणीही करण्यात आली. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन या धोरणाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर वेळी मोर्चाचे नेत्रुत्व किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ.अनिल घाटे व कॉ.अनिल हेपट,भाकपचे तालुका सचिव कॉ.मोरेश्वर कुंटलवार, व कॉ.भास्कर बल्की, कॉ.अथर्व निवडींग, कॉ.पांडुरंग ठावरी यांनी केले.मोर्चात बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.