घुग्घुस गुदमरतेय: प्रदूषणाच्या विळख्यात शहर,” प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत!”
घुग्घुस:
चंद्रपुर जिल्ह्याच्या घुग्घुस शहर आज प्रदूषणाच्या भयानक विळख्यात सापडले असून, ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात औद्योगिक कारखान्यांतून होणाऱ्या अनियंत्रित प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनाचे आजार, त्वचारोग, तसेच इतर गंभीर व्याधींनी नागरिक त्रस्त झाले असताना नगरपरिषद मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे, ही बाब अत्यंत संतापजनक आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका तर अधिकच संशयास्पद असून, ते अक्षरशः कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसून येते. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. “घुग्घुस नंबर वन” ही ओळख आता विकासासाठी नव्हे, तर प्रदूषणासाठी होत आहे, ही शहरासाठी लाजिरवाणी बाब आहे.
राजकीय नेत्यांनीही आपापले ठेके, स्वार्थ आणि आर्थिक हितसंबंध जपण्यात गुंतून सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ चालवला आहे. जनतेच्या आरोग्याचा प्रश्न दुय्यम ठरवून राजकीय सोयीस्कर मौन पाळले जात आहे, हे अक्षम्य आहे.
याच पार्श्वभूमीवर “घुग्घुस बचाव – प्रदूषण हटाव” मोहीम हाती घेण्यात येत असून, नागरिक आता शांत बसणार नाहीत. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ जागे होऊन कठोर पावले उचलली नाहीत, तर जनआंदोलन उभे राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
घुग्घुसकरांचा एकच सवाल – “आमच्या जीवाशी खेळ थांबवणार कोण?”