Home राजनीती *ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरचा लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस*

*ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरचा लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस*

107

*ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरचा लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस*

*दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला ; कधीच बनवाबनवी केली नाही- सुधीर मुनगंटीवार*

*वणी येथील प्रचार सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी दिली विकासाची ग्वाही*

*वणी (जि. यवतमाळ), दि. १४ : संपूर्ण विश्वाने नेता मानलेले नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व स्वीकारणे किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांच्या इंडिया आघाडीला देशाचे तुकडे करू देणे, असे दोनच पर्याय आता आपल्याकडे शिल्लक राहिले आहेत. पहिला पर्याय प्रगतीकडे नेणारा तर दुसरा अधोगतीकडे नेणारा आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाचा धडाका बघता ते खासदार झाल्यास चंद्रपुरचा ‘मेकओव्हर’ करतील, अशी खात्री आहे. मतदारांनी त्यांना कौल दिल्यास ते विजयी होतील आणि काँग्रेसला धक्का बसेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले.*

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील टिळक चौक, शासकीय मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदारांना साद घातली. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार डॉ. अशोक उईके आमदार संजय रेड्डी बोदकुरवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मनसेचे राजू उंबरकर, रवी बेलूरकर, विनोद मोहितकर यांच्यासह भाजपा-शिवसेना रिपाइं, रासप महायुतीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या आमदारकीच्या काळात, मंत्रिपदाच्या काळात चंद्रपूरचा कायापालट केला. विकास कामांसाठी मुनगंटीवार सतत आग्रही असतात. प्रत्येकाने किमान एकदा तरी चंद्रपूरचे बदलेले रूप पहावे. श्री. सुधीर मुनगंटीवार लोकसभेत खासदार म्हणून गेल्यास काय करू शकतील, याची त्यावरून कल्पना येते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आयुष्यात आपण कधीच बनवाबनवीचे राजकारण केले नाही. राजकारणात प्रवेश केला त्या दिवसापासून आपण मतदारसंघाच्या तसेच जिल्ह्याच्या प्रगतीचा विचार केला. मतदारांना जो शब्द दिला, तो पूर्ण केला. आतापर्यंत केलेल्या प्रत्येक विकास कामाचा पुरावा आपल्याकडे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जिंकताच वणी विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करून दाखवू, असा शब्द राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

यावेळी ना. श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, की व्यक्तीला साधे मोबाइल सीमकार्ड घ्यायचे असेल, तर आपण चांगली सेवा देणारी कंपनी निवडतो. मग देश चालवायचा प्रश्न असेल तेव्हा विकास करणारी पार्टीच निवडली पाहिजे. देशाचा पंतप्रधान कोण होणार, हे लहान बालकाला विचारले तरी तो नरेंद्रजी मोदीजी हेच नाव घेईल. देशात जर मोदींचे सरकार येणार असेल, तर अन्य पक्षाच्या उमेदवारांकडे बघायचेच कशाला?

गेल्या दहा वर्षात नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा कायापालट केला. देशाचा परिपूर्ण विकास करायचा असेल तर भाग्यरेषा नसलेला काँग्रेसचा तुटका पंजा मतदारांनी विसरावा. देशात आणि राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. अशात केवळ जातीच्या आधारावर किंवा भावनिक आधारावर मतदार बळी पडले तर मतदारसंघ मात्र माघारेल असे मुनगंटीवार म्हणाले.

*काँग्रेसकडून शहिदांचा अपमान*

काँग्रेस कायम सत्तेसाठी हपापली आहे. काँग्रेसने आजपर्यंत देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या अनेक शहिदांचा अपमान केला आहे. केवळ जातीचे राजकारण केले आहे. अशात काँग्रेसला मतदान कराल तर भविष्यातील पिढी आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. जात ही घराच्या उंबरठ्याच्या आत असते. डॉक्टर रुग्णाची जात पाहून उपचार करीत नाही. शिक्षक विद्यार्थ्याची जात पाहून शिक्षण देत नाही. हवा, पाणी, निसर्ग कोणाला जात विचारत नाही. त्यामुळे जातीच्या आधारावर मतदान करू नका, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

*दहा वर्षात काय केले?*

काँग्रेसच्या खासदार, आमदारांची दहा वर्ष सत्ता होती. या दहा वर्षांत त्यांनी कोणती विकासकामे केली ? याची यादी सादर करावी. आपण केलेल्या कामाची यादीच नव्हे तर प्रत्यक्ष पुरावा आपण सादर करीत आहोत. काँग्रेसने मतदारसंघात केलेल्या 21 मोठ्या कामांची यादी दिली तरी पुरेसे आहे. काँग्रेसने विकास कामेच केली नसल्याने आता जातीचा आधारावर भावनिक साद घालावी लागत आहे, असा घणाघात ना. श्री. मुनगंटीवार यांनी केला.

*आता आम्ही दोघे आहोत!*

आमदार संजय रेड्डी यांना उद्देशून देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, तुम्ही जेव्हा निधी मागितला आम्ही दिला. चिंता करू नका. पिण्याच्या पाण्याची वणीची योजना जवळपास मंजूर करून ठेवली आहे. आचारसंहिता झाली की त्यालाही निधी मिळेल. संजय रेड्डी तुम्ही एकटे नाहीत. आता एकीकडे श्री. सुधीर मुनगंटीवार आहेत आणि दुसरीकडे मी आहे. केंद्र आणि राज्य सरकार असा दोन्हींचा निधी कमी पडणार नाही ही ग्वाही देतो.

*धनोजे कुणबी परिवर्तन महिला संस्थेच्या पदाधिकारी यांचा भाजपात प्रवेश*

कार्यक्रमादरम्यान धनोजे कुणबी परिवर्तन महिला संस्थेच्या वणी अध्यक्ष संध्याताई नादेकर, रुंदाताई नागरकर आदींनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here